Nashik Ring Road Farmers Hunger Strike
नाशिक : नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अद्यापही एरणीवरच असल्याचा आरोप करत छावा क्रांतिवीर सेना यांच्या नेतृत्वाखाली रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी शासन आणि प्रशासनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी केवळ बैठकींच्या तारखा, आश्वासने आणि सकारात्मक निर्णयाचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. काही शेतकऱ्यांकडे एक ते दोन एकरच जमीन असून, तीही संपादित झाल्यास त्यांच्या कुटुंबासमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे योग्य मोबदला, पुनर्वसन आणि न्याय मिळावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
यापूर्वी विविध स्तरांवर शेतकरी प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांसोबत चर्चा केली. मंत्री गिरीश महाजन यांनीही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते . काही दिवसांपूर्वी शेतकरी विधानभवनाकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्या वेळी मंत्री उदय सामंत यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन आणि पत्र दिल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या रिंग रोड बाधित शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले असून, “न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
“रस्ता होणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शेतकरी जगणेही महत्त्वाचे आहे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Nashik Ring Road Farmers Hunger Strike
भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला; नाशिक ग्रामीण पोलिसांची कठोर कारवाई, ९ आरोपी जेरबंद


[…] […]