Gangapur Dam Water Storage Nashik
नाशिक प्रतिनिधी : दिपक सरोदे
नाशिक : काही महिन्यांपूर्वी निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेकडून शहरात आठवड्यातील प्रत्येक शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उपलब्ध पाणीसाठा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता परिस्थितीत मोठा बदल झाला असून गंगापूर धरणातील पाणीसाठा 70.69 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शहराला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नाशिककरांचे म्हणणे आहे की, धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाल्यानंतरही प्रत्येक शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवावा लागत आहे. त्यामुळे हा निर्बंध तातडीने हटवून पूर्वीप्रमाणे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, शहरातील विविध भागांत पाण्याच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही भागांत नळाद्वारे येणाऱ्या पाण्याला तीव्र क्लोरीन (पावडर)चा वास येत असल्याच्या तक्रारी आहेत. तर काही परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशा पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेकडे स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी नियमित उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि वितरण व्यवस्थेची तपासणी करून गढूळ किंवा दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा तातडीने बंद करावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
गंगापूर धरणातील पाणीसाठा 70.69 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शनिवारी बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि शहरभर स्वच्छ व उत्तम दर्जाचे पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.
Gangapur Dam Water Storage Nashik


[…] […]
[…] […]