School Certificate Fee Maharashtra
प्रतिनिधी : दिपक सरोदे
महाराष्ट्रातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसाठी विद्यार्थी व पालकांकडून ₹५० ते ₹५०० पर्यंत शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दहावी-बारावीनंतर तसेच पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला अत्यंत आवश्यक असतो. शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पहिला दाखला मोफत देण्यात यावा अशी तरतूद असतानाही काही शाळा व महाविद्यालयांकडून ₹२०० ते ₹५०० पर्यंत शुल्क मागितले जात असल्याचा आरोप आहे.
याशिवाय इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असताना बोनाफाईड प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर शासकीय कामांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठीही ‘मदत निधी’ किंवा इतर कारणे सांगून ₹५० ते ₹१०० पर्यंत रक्कम घेतली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवावे, दर महिन्याला संस्थांचे ऑडिट करावे तसेच शिक्षणाचा दर्जा आणि सुरक्षा व्यवस्थेची नियमित तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनेक शाळांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा, शालेय वाहनांची सुरक्षितता, सीसीटीव्ही व्यवस्था आणि परिसराची स्वच्छता यांचा अभाव असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, बोर्डिंग आणि क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करावे, रॅगिंग आणि टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी कठोर शासन निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
School Certificate Fee Maharashtra
चामर लेणी येथे २५० हून अधिक देशी वृक्षांचे वृक्षारोपण


[…] शाळा-कॉलेजमध्ये दाखल्यासाठी शुल्क आक… […]