Nashik Ring Road Farmers Protest
नाशिक : नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तब्बल १६ तासांनंतर मोठे यश मिळाले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि रिंग रोड बाधितांच्या सर्व प्रश्नांवर मंत्रालयात ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र, आंदोलनास परवानगी रद्द झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्यांना सरकारवाडा पोलीस ठाणे परिसरात रोखले. त्यानंतर पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने सकारात्मक तोडगा निघाला.
मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि मंत्रालयात संबंधित मंत्री, प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करून सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनाचे नेतृत्व करणारे करण गायकर यांनी हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा असल्याचे सांगत मंत्रालयातील बैठकीत कायमस्वरूपी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Mahadut Janbindu : Vishal Bhadane Nashik Ring Road Farmers Protest



[…] […]