ST Bus Breakdown Bardipada Ragatvihir Route
सुरगाणा | प्रतिनिधी – लक्ष्मण बागुल
सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बहुल बर्डीपाडा–रगतविहिर मार्गावर धावणाऱ्या एसटी बस वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांचा संताप शिगेला पोहोचला आहे. प्रवासादरम्यान बस कधी बंद पडेल याची शाश्वती नसल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि नोकरदार वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सुरक्षिततेशी एसटी प्रशासन खेळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर रगतविहिर येथून परत येणाऱ्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस वणी बसस्थानकात नादुरुस्त अवस्थेत बाजूला उभी करावी लागली. या घटनेमुळे विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. कळवणहून येणाऱ्या इतर बस पूर्ण क्षमतेने भरलेल्या असल्याने अनेक प्रवाशांना बसस्थानकात तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर काही प्रवाशांना कळवणमार्गे नाशिककडे रवाना करण्यात आले.
दरम्यान, या समस्येबाबत तक्रार करण्यासाठी प्रवासी कळवण एसटी डेपोमध्ये जातात. मात्र, अनेकदा डेपो व्यवस्थापक अनुपस्थित असल्याने तक्रार ऐकणारेच कोणी नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. व्यवस्थापकांची बदली झाल्यानंतर जबाबदार अधिकारी नेमका कोण, असा सवालही प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
ग्रामीण भागासाठी मोठ्या गाजावाजात दाखल करण्यात आलेल्या ‘आईसाहेब राज जिजाऊ’ या नवीन बस ग्रामीण मार्गांवर न चालवता सप्तशृंगी गड व नाशिक मार्गावर धावतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आदिवासी भागासाठी मंजूर झालेल्या बस इतर मार्गांवर वळवून ग्रामीण प्रवाशांवर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रवाशांनी बर्डीपाडा–रगतविहिर मार्गावर तातडीने नवीन व सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्याव्यात, कळवण डेपोमध्ये कायमस्वरूपी जबाबदार अधिकारी नियुक्त करावा आणि ग्रामीण एसटी सेवा सुधारावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा एसटी महामंडळ, कळवण डेपो आणि नाशिक विभागीय कार्यालयाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.
ST Bus Breakdown Bardipada Ragatvihir Route
पत्नी आणि चिमुकल्या मुलाची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, शहर हादरले


[…] ‘बस की भंगार?’ बर्डीपाडा–रगतविहिर मा… […]