Sakal Maratha Samaj State Level Meeting Nashik
नाशिक, दि. ६ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून आगामी काळातील भूमिका निश्चित करण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय बैठक आता मुंबईऐवजी नाशिकमध्ये होणार आहे. मुंबईत सभागृह उपलब्ध न झाल्याने तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर बैठकीचे ठिकाण नाशिक निश्चित करण्यात आले आहे.
मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नाशिक येथील कालिका माता मंदिर, मुंबई नाका परिसरातील सभागृहात ही बैठक होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून समाजासाठी कार्यरत असलेले समन्वयक, पदाधिकारी आणि समाजबांधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. _ Sakal Maratha Samaj State Level Meeting Nashik
मराठा समाजाला SEBC अंतर्गत मिळालेले १० टक्के आरक्षण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या आरक्षणाला भविष्यात घटनात्मक संरक्षण मिळण्यासाठी शासनाने कोणती ठोस आणि कायदेशीर पावले उचलावीत, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. यासोबतच सारथीच्या योजनांचा विस्तार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहांची उपलब्धता, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक व आर्थिक सवलती याबाबतही विचारविनिमय केला जाणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान समाजबांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवरही समाजाची सामूहिक भूमिका ठरविण्याबाबत चर्चा होणार आहे. _ Sakal Maratha Samaj State Level Meeting Nashik
याशिवाय कोपर्डी भगिनींच्या प्रकरणातील उर्वरित दोन दोषींना फाशीची शिक्षा कधी होणार, हा संवेदनशील मुद्दाही बैठकीत चर्चेला घेतला जाणार आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि शासनाची भूमिका याबाबतही विचारमंथन होईल.
राज्यस्तरीय बैठकीच्या नियोजनासाठी नाशिकमध्ये पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. मुंबई नाका येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीत राज्यभरातून येणाऱ्या समाजबांधवांचे स्वागत, बैठकीचे व्यवस्थापन, उपस्थिती आणि चर्चेचे विषय याबाबत नियोजन करण्यात आले.
या बैठकीस सुनील बागुल, करण गायकर, नानासाहेब बच्छाव, विलास पांगारकर, शिवाजी सहाने, चंद्रकांत बनकर, आशिष हिरे, नितीन सुगंधी, अण्णा पिंपळे, अनिल आहेर, राम निकम, वैभव दळवी, अक्षय कातड, सागर लोणे, विनायक ढेमसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.
मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून एकत्रित आणि ठोस भूमिका निश्चित करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सकल मराठा समाजाचे समन्वयक, पदाधिकारी आणि समाजबांधवांनी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कालिका माता मंदिर सभागृह, मुंबई नाका, नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात आले आहे.

