Godavari River Safety Incident in Nashik
नाशिक : रामकुंड परिसरातील चक्रधर स्वामी मंदिराजवळ गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबई येथील पर्यटकांच्या गटातील चार बालके पाण्यात बुडाल्याची घटना घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटना लक्षात येताच जवळच असलेल्या जीवरक्षक दलाच्या जवानांनी तसेच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. यावेळी चारपैकी तीन बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र, एका १२ वर्षीय बालकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोदावरी नदीपात्रात यापूर्वीही बुडण्याच्या तसेच जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत. नदीकाठावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण जाळ्या, सुरक्षित अडथळे आणि इतर उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, या उपाययोजनांकडे अद्याप पुरेसे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. _ Godavari River Safety Incident in Nashik
गोदावरी नदीकाठावर केवळ नदीत बुडण्याच्याच घटना घडत नाहीत, तर पाण्यात वाहने जाणे, नागरिक वाहून जाणे तसेच आत्महत्यांच्या घटनाही घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असताना नदीकाठच्या सुरक्षेसाठी संरक्षण जाळ्या आणि आवश्यक उपाययोजना करण्यास निधीअभावाचे कारण पुढे करता येणार नाही. त्यामुळे नाशिक महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने संपूर्ण गोदावरी नदीकाठाचा सुरक्षा आढावा घेऊन धोकादायक ठिकाणी तातडीने संरक्षण जाळ्या व सुरक्षित अडथळे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भविष्यात अशा दुर्घटनांमध्ये जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
न्यूज महादूत | जनबिंदू प्रतिनिधी – दीपक सरोदे _ Godavari River Safety Incident in Nashik

